नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर हे शनिवारी (दि. ३१) भारतीय पोलीस सेवेतून निवृत्त होत आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने त्यांनी गेल्या मार्च महिन्यात पुन्हा पदभार स्वीकारला होता, तर जानेवारी महिन्यात बदलून आलेले दत्तात्रय कराळे यांना अवघ्या तीन महिन्यांत आपला चार्ज सोडावा लागला होता. दरम्यान, डॉ. शेखर यांच्या निवृत्तीने गृहविभागाकडून पुन्हा कराळे यांच्याकडे नाशिकच्या विशेष पोलीस महानिरीक्षक पदाचा कार्यभार सोपविला जाणार असल्याची चर्चा आहे.
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ३१ जानेवारी २०२४ रोजी गृह विभागाने नाशिकचे एसआयजी डॉ. शेखर यांची बदली करून पुणे येथील मोटर परिवहन विभागात नियुक्ती केली, तर ठाणे शहराचे सहआयुक्त दत्तात्रय कराळे यांच्याकडे नाशिक परिक्षेत्राची जबाबदारी सोपविण्यात आली. २ फेब्रुवारी रोजी कराळे यांनी परिक्षेत्राची सूत्रे हाती घेतली; परंतु डॉ. शेखर यांनी कॅटमध्ये याचिका दाखल केली होती. दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी, तसेच मेअखेरीस निवृत्ती असतानाही बदलीचे आदेश निर्गमित केल्याचा दावा डॉ. शेखर यांनी याचिकेत केला होता. त्यानुसार दि. ५ मार्च रोजी कॅटने अंतिम निर्णय दिला. डॉ. शेखर यांच्या बदलीस स्थगिती देत त्यांना पुन्हा नाशिक परिक्षेत्रात नियुक्ती देण्याचे स्पष्ट केले, तर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये डॉ. शेखर यांची नाशिकमध्ये पदस्थापना झाली. त्यानुसार २० मार्च रोजी डॉ. शेखर यांनी पदभार स्वीकारला होता. त्यानंतर कराळे यांच्या नव्या नियुक्तीचे आदेश निर्गमित झालेले नव्हते. त्यामुळे डॉ. शेखर यांच्या सेवानिवृत्तीनंतर पुन्हा कराळे यांच्याकडे नाशिकची सूत्रे जाणार आहेत. दरम्यान, डॉ. शेखर यांनी साडेतीन वर्षांत नाशिक परिक्षेत्रात अमली पदार्थ विरोधी अभियानांतर्गत अनेक कारवाया केल्या, तसेच साहित्य क्षेत्रात त्यांनी विशेष ठसा उमटवला.