निवेदन देऊनही प्रश्न सुटला नाहीमेव्हणे ग्रामस्थांनी महिनाभरापासून आपण मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचे लेखी निवेदन प्रशासनाला सादर केले होते. यामध्ये बंद पडलेली ५६ खेडी पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात यावी, झाडी धरणाचे काम पूर्ण करावे, गावात सध्या दोन टँकर्सने पाणीपुरवठा केला जातो. मात्र, तो अपुरा पडत असल्यामुळे टँकर्सची संख्या वाढवावी, यासह विविध मागण्या ग्रामस्थांनी केल्या आहेत.
नाशिक (प्रतिनिधी): लोकसभेच्या निवडणुकीत मतदारांनी ऊन-पावसाची तमा न बाळगता सहभागी होत अनेक ठिकाणी मतदानाचा टक्का वाढवला. परंतु, दिंडोरी लोकसभा मतदारसंघात येणा-या मालेगाव तालुक्यातील ‘मेहुणे’ गावचे नागरिक मात्र याला अपवाद ठरले. गावाच्या मूलभूत प्रश्नांसाठी जवळपास पावणेतीन हजार मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला. अपर जिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलीस आदी मुख्य प्रशासकीय अधिका-यांनी ग्रामस्थांची भेट घेत समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, सायंकाळी मतदान संपेपर्यंत एकाही मतदाराने मतदान केले नाही.
लोकसभा निवडणुकीचा उत्सव सर्वत्र साजरा झाला. मात्र, मेव्हणेकरांनी आपल्या मूलभूत हक्कासाठी काळजावर दगड ठेवून लोकशाही उत्सवाच्या मंडपातून जड अंत:करणाने काढता पाय घेतला. मेव्हणे गावाचा परिसर हा दुष्काळी भाग आहे. या भागात दरवर्षी दुष्काळ असतो. मात्र, या दुष्काळावर तोडगा काढता येऊ शकतो, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्याबाबत त्यांनी कामांची आखणी देखील केली आहे. तरीदेखील प्रशासन मात्र त्यांच्या या कल्पनेला सत्यात उतरवत नसल्यामुळे ग्रामस्थांना भयाण अशा दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे मेहुणे गावाच्या ग्रामस्थांनी लोकसभा निवडणूक मतदानावर पूर्णपणे बहिष्कार घातला. गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ५३, ५४ आणि ५५ या मतदान केंद्रावर मतदान संपेपर्यंत एकही मतदान झाले नाही. तीनही मतदान केंद्रांवर एकूण २७५७ मतदार आहेत. विशेष म्हणजे उमेदवारांचे बूथ प्रतिनिधीही मतदान केंद्रावर आले नाहीत.
गावात मतदारांची संख्या मोठी असल्याने ग्रामस्थांनी बहिष्कार मागे घ्यावा यासाठी सर्व अधिका-यांनी दिवसभर त्यांची मनधरणी केली. परंतु, ग्रामस्थ निर्णयावर ठाम राहिल्याने सायंकाळपर्यंत प्रशासन ताटकळून उभे होते. तर दुसरीकडे मतदान केंद्रावर शुकशुकाट पसरलेला पाहायला मिळाला.