नाशिक (प्रतिनिधी): दिवसभर ढगाळ वातावरण, तापमानात झालेली वाढ आणि त्यात विजेचा लपंडाव यामुळे नाशिककर अक्षरश: घामाघुम झाले. विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट आणि वादळी वा-यासह जिल्ह्यात शनिवारी (दि.११) सलग दुस-या दिवशी अवकाळीने दणका दिला. शहर परिसरात रात्री नऊच्या सुमारास सोसाट्याचा वारा सुटला. त्यानंतर अर्ध्या तासाने ढगांचा गडगडाट सुरू होऊन पावसाच्या सरी बरसल्या. दरम्यान, सायंकाळपासूनच अनेक ठिकाणचा विद्युतपुरवठा खंडित झाल्याने नागरिक उकाड्याने त्रस्त झाले.
जिल्ह्यातील वातावरणात दोन दिवसांपासून बदल झाला असून, शुक्रवारनंतर शनिवारी देखील पावसाने हजेरी लावली. सकाळपासूनच प्रचंड उकाड्यानंतर शनिवारी दुपारनंतर जिल्ह्यातील काही ठिकाणांसह शहर परिसरात नाशिकरोड व सिडको, पंचवटीसह काही भागात अवकाळी पावसाने सोसाट्याचा वारा व विजांच्या गडगडाटासह हजेरी लावली. यामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला. पुढील पाच दिवसांचा अंदाज लक्षात घेता जिल्ह्यात दि. ११ ते १५ मे या कालावधीत हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
हवामान उष्ण व दमट राहून आकाश पुढील पाच दिवस अंशत: ढगाळ राहील, असा अंदाज महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या इगतपुरी विभागीय कृषी संशोधन केंद्राने वर्तविला आहे. या काळात वा-याचा वेग ११-१५ कि.मी. प्रतितास या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. शनिवारी सायंकाळनंतर वातावरणात अचानक बदल होऊन काळे ढग जमून आले. यानंतर विजांच्या कडकडाट झाला. शहर परिसरातील काही भागात सोसाट्याच्या वा-यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. या काळात मात्र विजेचा लपंडाव सुरूच होता. दरम्यान, परिसरात शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास वादळी वा-यासह पावसाने हजेरी लावली. यावेळी जोरदार वा-यामुळे ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली. पावसामुळे सखल भागात पाणी साचल्याचे दिसून आले. दरम्यान, वातावणात झालेल्या बदलामुळे ३७ अंशांवर आलेले जिल्ह्याचे तापमान पुन्हा ३९ अंशांपार गेले आहे. शुक्रवारी (दि. १०) ३७.३ अंशांवर असलेल्या कमाल तापमानात शनिवारी २ अंशांची वाढ नोंदवली गेली.