नाशिक (प्रतिनिधी): नाशिक लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे नाराज झालेल्या विजय करंजकर यांनी आपली नाराजी उघडपणे मांडत लढणार आणि पाडणार अशी भूमिका घेतली. विजय करंजकरांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी देखील दाखल केली आहे. शनिवारी विजय करंजकर यांनी हितचिंतकांचा मेळावा घेत उमेदवारी संदर्भात निर्णय घेतला मात्र रविवारी विजय करंजकर महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्यासोबत फिरत असल्याची चर्चा होती त्याला अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही मात्र त्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले गेले.
करंजकर यांनी शनिवारी झालेल्या मेळाव्यात मी तेरा वर्षांपासून जिल्हाप्रमुख पदावर कार्यरत असताना अनेकांची कामे केली. त्यामुळे आता पुढील काळात आपण सर्व मला साथ द्याल अशी अपेक्षा ठेवून उमेदवारीवर ठाम असल्याची भूमिका घेतली . देवळाली येथे विजय करंजकर यांचा हितचिंतक मेळाव्याला जिल्हाभरातून विजयी करंजकर यांच्या हितचिंतकांनी हजेरी लावली होती. त्यामुळे आता महाविकास आघाडीच्या उमेदवाराला आव्हान देण्याची भूमिका विजय करंजकर यांनी घेतली असल्याचे पाहायला मिळत आहे.
करंजकर यांनी बाळासाहेब ठाकरे हयात असल्यापासून मी पक्षासाठी काम करतोय. अनेक ठिकाणी त्याग केला आहे. त्यामुळे आता किती संघर्ष करावा लागला तरी करणार, असं देखील विजय करंजकर म्हणाले. मी जिल्हाप्रमुख असताना अनेकांना एबी फॉर्म दिले. विधानसभेसाठी देखील मी एबी फॉर्म दिला, मात्र स्वतःच्या घरातून चहा पिऊन काम केले, कोणाचा एक कप चहाही घेतला नाही, असे बोलत थेट ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांवर विजय करज करांनी गंभीर आरोप केले. माझी निष्ठा मातोश्री सोबत असून ज्याला मी २००८ साली उपजिल्हाप्रमुख केले. तो माझ्यावर भुंकतो, असे बोलत विजय करंजकरांनी ठाकरे सेनेच्या नेत्यांवर टीका केली. मला वेळ देऊनही न बोलता माझा अभिमान केला. मी त्यांचा शोध घेत आहे आणि विजय करंजकर ज्यांना टिळा लावतो तो विजयी होतो असे देखील विजय करंजकर यांनी उपरोधिक टोलवाटोलवी केली आहे. त्यामुळे आता मी नडणार आणि लढणार अशी भूमिका विजय करंजकर यांनी घेतली आहे. पक्षात मी एकटाच इच्छुक होतो. वाजेंना उमेदवारी दिल्यानंतर वाजे यांचे नाव न घेता ज्यांना उमेदवारी मिळाली. त्यांनी माझ्या घरी येऊन परस्पर उमेदवारी मिळवल्याची कबुली दिली असती तर माझे मन शांत झाले असते, असे देखील विजय करंजकर यांनी राजाभाऊ वाजे यांच्या उमेदवारी संदर्भातील घडामोडींवर बोलताना भाष्य केले आहे. माझा बाप शेतकरी होता असे बोलत वाजे यांचे आजोबा-आजी हे देखील आमदार होते, असे बोलत थेट राजाभाऊ वाजे यांच्यावर विजय करंजकरांनी निशाणा लगावला आहे. त्यामुळे आता मी लढणार आणि पाडणार अशी भूमिका विजय करंजकर यांनी घेतली आहें.