अक्षयतृतीया स्पेशल: रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यातुन आलेला अंबा मिळणार!
मंगेश ताकाटे, नाशिक: कोकण पर्यटन विकास संस्था आयोजित कोकण आंबा महोत्सवाचे आज नाशिक येथे पिनॅकल मॉल मध्ये सह्याद्री फार्मचे कार्यकारी संचालक आणि प्रगतिशील शेतकरी माननीय विलासराव शिंदे यांच्या शुभहस्ते शानदार उद्घाटन झाले. नाशिककर दरवर्षी कोकण आंबा महोत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतात. यावेळी आंबा पिक चांगले आले असल्याने मोठ्या संख्येने कोकणातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आंबा उत्पादक शेतकरी नाशिक येथे आंबा महोत्सवात सहभागी झालेले आहेत. या आंबा महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे फक्त कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांनाच स्टॉल दिले जातात. शिवाय शेतकऱ्यांनी आंबा नैसर्गिक पद्धतीनेच पिकवावा अशी अट असते. या ठिकाणी सहभागी होणारे शेतकरी गेली अनेक वर्ष आंबा विक्री साठी सहभागी होत असल्याने स्थानिक ग्राहकांशी त्याचा परिचय झालेला आहे. त्यामुळे शेतकरीही ग्राहकांना नैसर्गिक रित्या गवतात पिकवलेला आंबा पुरवतात. त्याचबरोबर कोकण पर्यटन विकास संस्थेने आंबा, काजू, फणस, करवंद इत्यादींपासून बनविलेला कोंकण मेवा विक्रीसाठी ठेवलेला आहे. शिवाय कोकण पर्यटन विषयक माहिती देण्यासाठी कोकण पर्यटन मेळा आयोजित केलेला आहे.
आंबा महोत्सवाचे वैशिष्ट्य:
निसर्गाचे वरदान लाभलेल्या कोकणातील रमणीय सागर किनारे, वॉटर स्पोर्ट्स, त्याचबरोबर सागरी किल्ले, ऐतिहासिक ठिकाणे, पुरातन मंदिरे अशा विविध पर्यटन स्थळांची माहिती या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे.
नाशिककरांनी या उत्सवाचा लाभ घ्यावा. या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स च्या नाशिक शाखेचे चेअरमन मा. संजय सोनवणे चेंबरच्या एग्रीकल्चर कमिटीचे चेअरमन राजारामजी सांगळे आदींच्यावतीने नाशिकरांना आवाहन करण्यात आले आहे.