माहिती अधिकारातून बाब उघड; गतवर्षी ६६ टक्के जागांवरच झाले प्रवेश!
नाशिक (प्रतिनिधी): महानगरपालिका क्षेत्रातील विविध ८८ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावीसाठी आँनलाईन केंद्रिभूत पद्धतीने २७ हजार ३६० जागांसाठी २०२३-२४ मध्ये प्रवेशप्रक्रिया राबवण्यात आली. नियमित तीन आणि विशेष पाच फे-या पूर्ण झाल्यानंतरही शैक्षणिक वर्षात जवळपास ९ हजार ३७७ (३४ टक्के) जागा रिक्त राहिल्याचे समोर आले आहे. राज्यातील अन्य महाविद्यालयांमध्येही ३० ते ३५ टक्के जागा शिल्लक राहिल्याची बाब माहिती अधिकारातून उघड झाली आहे. त्यामुळे दरवर्षी अकरावी प्रवेशांच्या वाढत्या जागांबाबत आता प्रश्न निर्माण झाला आहे.
शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये पाच शहरांमध्ये राबवण्यात आलेल्या अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतून केवळ ७० टक्के जागांवर प्रवेश झाल्याचे समोर आले आहे. तसेच १०० टक्के प्रवेश झालेल्या विभाग आणि माध्यमांची संख्या १० टक्के देखील नाही. शून्य ते २० टक्क्यांपेक्षा कमी प्रवेश झालेल्या विभाग आणि माध्यमांची संख्या ३० ते ३५ टक्के असल्याचे समोर आले आहे. व्यवस्था सुधारण चळवळ (सिस्कॉम) संस्थेच्या वैशाली बाफना यांनी माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीच्या आधारे अकरावी प्रवेशांबाबत तयार केलेल्या सविस्तर अहवालातून ही बाब समोर आली आहे. हा अहवाल शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांना देण्यात आला आहे.
अकरावीसाठी राबविण्यात येणाºया आँनलाईन प्रवेशात व्यवस्थापन, अल्पसंख्याक, इनहाऊस अशा विविध कोट्यातंर्गत प्रवेश प्रक्रिया शून्य ते शेवटच्या फेरीपर्यंत संधी दिली जाते. मात्र कोट्यातंर्गत प्रवेशात निम्म्याहून अधिक जागा रिक्त राहत असल्याचे अहवालातून दिसून आले.
अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत झालेले प्रवेश गुणवत्तेनुसारच आहेत का, दरवर्षी नवीन कनिष्ठ महाविद्यालयांना मान्यता देताना किंवा प्रवेश क्षमता वाढवून देताना किती कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश झालेले नाहीत, २० टक्क्यांपेक्षा कमी प्रवेश किती महाविद्यालयात झाले, त्यातील किती महाविद्यालये अनुदानित आहेत, अतिरिक्त ठरणा-या शिक्षकांचे काय करायचे, अशा कोणत्याही बाबींचा आढावा घेतला जात नसल्याचे निष्पन्न झाले आहे, अशी माहिती बाफना यांनी दिली आहे.