नाशिक (प्रतिनिधी): वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह सोमवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील १०७ गावांतील ७२९ हेक्टवरील पिके व फळबागांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सुरगाणा तालुक्यात सर्वाधिक ५०२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. सुरगाणा व त्र्यंबकेश्वर या दोन्ही तालुक्यात ६१२ हेक्टवरील आंब्याचे नुकसान झाले आहे.
एप्रिलच्या मध्यावर जिल्ह्यातील तापमानाने ४० अंशाचा टप्पा ओलांडला आहे. सोमवारी (दि. १४) सुरगाणा, बागलाण, पेठ, त्र्यंबकेश्वर, कळवण आदी भागात वादळी वा-यासह अवकाळीने हजेरी लावली होती. पावसाचा सर्वाधिक फटका सुरगाणा, त्र्यंबकेश्वर व पेठ तालुक्यांना बसल्याचे कृषी विभागाच्या अहवालानुसार स्पष्ट झाले आहे. सुरगाणा तालुक्यातील आंबुपाडा, बेडसे, ठाणगाव गुरूटेंभी, झगडपाडा, खोकरविहीर, कोडीपाडा, हस्ते, जाहुले या गावात वादळासह अवकाळी पावसाने एक ते दीड तास हजेरी लावली. यात काही घरांसह आंबा बागांचे मोठे नुकसान झाले आहे. काहींच्या घरावरील पत्रे, कौलांचे नुकसान झाले आहे. तर त्र्यंबकेश्वर तालुक्यात सोमवारी संध्याकाळी जोरदार वा-यासह पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात कै-या गळून पडल्या.
हरसूलसह ठाणापाडा, निरगुडे, खरशेत, दलपतपूर, तोरंगण, चिरापाली, चिंचवड, जातेगाव तसेच दुर्गम भागात खरवळ, आडगाव (देवळा), गावठा, शिरसगाव, मुरंबी या गावांमध्ये नुकसान झाले. १५ एप्रिल रोजी झालेल्या पावसामुळे ६४९ हेक्टरवरील आंब्याचे नुकसान झाले. ७१.९० हेक्टरवरील कांदा आणि ८.४० हेक्टरवरील भाजीपाल्याचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नैसर्गिक संकटात एकूण १०७ गावे बाधित झाली. येथील ३५१८ शेतक-यांना फटका बसला. तालुकानिहाय विचार करता सुरगाणा तालुक्यात ६८ गावे (२७७३ शेतकरी), त्र्यंबकेश्वर ३२ गावे (६३७ शेतकरी) आणि पेठ तालुक्यातील सात गावे (१०८) बाधित झाली.