नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक लोकसभेसाठी उमेदवार ठरविण्यावरून महायुतीचा गुंता व तिढा सोडविला जात नसताना आता महायुतीत नुकत्याच सहभागी झालेल्या मनसेने देखील उडी घेतली आहे. नाशिकच्या जागेचा तिढा सोडविण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका महायुतीच्या नेत्यांनी समजून घ्यावी, अशी सूचनावजा मागणी नाशिकच्या मनसे पदाधिका-यांनी केली आहे. त्यामुळे आता महायुतीकडून नाशिकची जागा निश्चित करताना मनसे पदाधिकाºयांना कितपत विश्वासात घेतले जाते, याकडे लक्ष लागून आहे.
मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात आपली भूमिका जाहीर करत पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला आहे. मनसेच्या या भूमिकेचे नाशिकमधील मनसेच्या पदाधिका-यांनी स्वागत करत महायुतीच्या प्रचारात उतरण्यास उत्सुकता दर्शविली आहे. मात्र, त्यासाठी महायुतीच्या नेत्यांनी मनसे पदाधिका-यांना विश्वासात घेऊन यंत्रणा उभारावी, अशी सूचनावजा मागणी या पदाधिका-यांनी केली आहे. नाशिक शहर आणि लोकसभा मतदारसंघ हा मनसेचा बालेकिल्ला असल्याचा दावा मनसैनिकांनी करत मागील निवडणुकांचे दाखले दिले आहेत. नाशिक शहरात २००८ मध्ये झालेल्या मनपा निवडणुकीत मनसेचे १२ नगरसेवक निवडून आले होते. २००९ मध्ये झालेल्या नाशिक लोकसभा निवडणुकीत सध्याचे विद्यमान खा. हेमंत गोडसे मनसेचे उमेदवार असताना त्यांना दोन लाख मते मिळाली होती. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत नाशिककरांनी मनसेचे शहरातून तीन आमदार निवडून दिले होते. याशिवाय ग्रामीण भागात जिल्हा परिषदेचे चार सदस्य, जवळपास २८२ इतके ग्रामपंचायत सदस्य व अनेक ग्रामपंचायती मनसेच्या ताब्यात होत्या. तसेच, २०१२ मध्ये झालेल्या नाशिक महापालिकेच्या निवडणुकीमध्ये मनसेची सत्ता आली होती. या काळात मनसेचे नाशिकचा कुंभमेळा यशस्वीपणे पार पाडल्याची आठवण पक्षाने लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीला करून दिली आहे.