अभियानाच्या यशस्वीतेसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी केले जास्तीतजास्त लोकांना सहभाग घेण्याचे आवाहन
नाशिक (प्रतिनिधी): टंचाईसदृश परिस्थितीचा सामना करण्यासाठी गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवारअंतर्गत राबविण्यात येणा-या जलसमृद्ध नाशिक अभियानास सोमवार (दि.१५) पासून प्रारंभ होत आहे. या अभियानाच्या यशस्वीतेसाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे. नागरिक व स्वयंसेवी संस्थांनी स्वयंस्फूर्तीने अभियानात सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले.
भोसला मिलिटरी कॅम्पसच्या मुंजे इन्स्टिट्यूट हॉलमध्ये यासंदर्भात आयोजित बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. बैठकीस महानगरपालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे, जिल्हा जलसंधारण अधिकारी हरिभाऊ गिते यांच्यासह संबंधित अधिकारी व सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक संस्था आणि औद्योगिक, बांधकाम संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जलज शर्मा म्हणाले की, लोकसहभाग व प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात राबविण्यात येणा-या अभियानातून हरित नाशिक व पाण्याने समृद्ध असलेला जिल्हा साकार करावयाचा आहे. येत्या १५ एप्रिल ते १५ जून या कालावधीत या अभियानाची गंगापूर धरणापासून सुरुवात करण्यात येणार असून, जिल्ह्यातील इतर धरणे, नद्या व जलाशयांत ते राबविले जाणार आहे. या अभियानात धरणांमध्ये वर्षानुवर्षे साठलेला गाळ लोकसहभागातून काढला जाणार असून, अल्पभूधारक शेतकºयांना हा सुपीक गाळ त्यांच्या शेतात टाकण्यासाठी विनामूल्य उपलब्ध होणार आहे. यातून मोठ्या जलाशयांची पाणीसाठवण क्षमता वृद्धीस लागून शेतक ºयांच्या जमिनी सुपीक होऊन उत्पादन क्षमता वाढणार असल्याचे शर्मा यांनी यावेळी सांगितले.
गतवर्षी झालेल्या कमी पर्जन्यमानामुळे जिल्ह्यात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यावर मार्ग काढण्यासाठी जलसमृद्ध नाशिक या अभियानातून गावागावात लोकांपर्यंत पोहोचून त्यांना या अभियानात सहभागी करून घेण्याची ही उत्तम संधी आहे. यासाठी जैन संघटना यांच्यासह इतर सेवाभावी, धार्मिक, शैक्षणिक, औद्योगिक, बांधकाम संघटनांचेही सहकार्य लाभणार असल्याचे ते म्हणाले. सोमवारी सकाळी ८ वाजता गंगापूर धरणाजवळील गंगाव-हे गाव येथे या अभियानास प्रारंभ होणार असून, जिल्हावासीयांनी मोठ्या संख्येने यात सहभागी होण्याचे आवाहनही शर्मा यांनी यावेळी केले.