मुंबई : दरवर्षीच्या तुलनेमध्ये यंदा महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. ऐन पावसाळ्यात अनेक जिल्ह्यांकडे पावसाने पाठ फिरवली होती. परिणामी राज्यामधील प्रमुख धरणांमध्ये कमी पाणीसाठा जमा झाला. त्यामुळे डिसेंबर महिन्यातच भीषण पाणीटंचाईचं संकट निर्माण झालं आहे.
दरम्यान, राज्याच्या ६ विभागांतील धरणांमधील पाणीसाठा ६६.३१ टक्क्यांवर घसरला आहे. गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात राज्यामधील धरणातील ८७.१० टक्के इतका पाणीसाठा शिल्लक होता. त्यातुलनेत यंदा पाणीसाठा २० टक्क्यांनी कमी आहे. डिसेंबर महिन्यातच काही धरणांनी निच्चांक पातळी गाठल्याने अनेक शहरांमध्ये पाणीकपातीला सुरुवात झाली आहे. राज्यातील नाशिक, पुणे, अमरावती, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि कोकण या ६ विभागांमध्ये २ हजार ५९५ लहान-मोठे धरणप्रकल्प आहेत.
या धरणांमधील पाणीसाठ्याचा वापर शेती, पिण्याचे पाणी आणि औद्योगिक कारण्यासाठी केला जतो. यंदा काही अपवाद वगळता बहुतांश धरणे १०० टक्के भरलीच नाहीत. त्यामुळे राज्यावर भीषण पाणीटंचाईचं संकट निर्माण झालं आहे. सध्या राज्यातील कोकण विभागातील धरणांमध्ये सर्वाधिक ८२.६३ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी या विभागात याच वेळी ८३.१५ टक्के पाणीसाठा होता. दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर विभागात सध्या ३७.६३ टक्के एवढा राज्यातील नीचांकी पाणीसाठा आहे.
गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात छत्रपती संभाजीनगर विभागात ८७.३१ टक्के पाणीसाठा होता. तर नागपूर विभागातील धरणांमध्ये सध्या ७१.७८ टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षी तो ७९.४६ टक्के इतका होता. अमरावती गेल्या वर्षी ९१.५२ टक्के पाणीसाठा होता. यंदा तो ७५.६२ टक्के आहे. मुंबई तसेच पुणे विभागातील पाणीसाठ्यातही लक्षणीय घट झाली आहे. गेल्यावर्षी पुणे विभागातविभागात ८८.०८ टक्के पाणीसाठा होता. यंदा तो ७०.३९ टक्के आहे. पुण्यापाठोपाठ नाशिक विभागातील पाणीसाठाही कमी झाला आहे. गेल्या वर्षीच्या ८९.८९ टक्क्यांच्या तुलनेत नाशिकमध्ये सध्या ७०.६१ टक्के पाणीसाठा आहे.