येवला : शहर व परिसरामध्ये महिलांवरील वाढते अत्याचार, लव्ह जिहादच्या घटना संस्कृतीला व एकोप्याला छेद देणाऱ्या आहेत. नुकतीच येवला शहरामध्ये घडलेली घटना अतिशय संतापजनक असून, यातील संशयित नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी. तसेच लव्ह जिहाद आणि धर्मांतरबंदी कायदा त्वरित लागू करावा, असे प्रतिपादन हर्षदा ठाकूर यांनी केले आहे.
शहरामध्ये नुकत्याच घडलेल्या संतापजनक घटनेविरोधात हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मोर्चाचे रूपांतर स्वामी मुक्तानंद विद्यालयाच्या प्रांगणात सभेत झाले. यावेळी त्या बोलत होत्या. ठाकूर म्हणाल्या की, काही तरुण कामधंदा न करता त्यांचे राहणीमान अत्यंत खर्चिक व संशयास्पद आहे. हे तरुण शाळा-महाविद्यालय, क्लासेसचे टायमिंग, बसस्थानके, हॉस्पिटलकडे जाणाऱ्या परिचारिका व इतर ठिकाणी विद्यार्थिनी, महिला व तरुणींच्या मागे लागून त्यांना त्रास देत आपल्या जाळ्यात ओढतात. त्यांच्या आयुष्याचे वाटोळे करतात. मुलींसह त्यांचे कुटुंबही या जाचाचे बळी ठरतात. येवला शहर व परिसरात कुंटणखाने चालू आहेत, त्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ठाकूर यांनी यावेळी केली.
पोलीस स्टेशनमध्ये जाण्याचा व येण्याचा मार्ग एकच आहे. भविष्यामध्ये कोणत्याही कार्यक्रमाची परवानगी घेण्याकरिता आम्हाला अडचणीचे राहील. पोलीस ठाण्याचे स्थलांतर रद्द करण्यात यावे. गावच्या मध्यवर्ती ठिकाणी जुने कोर्ट किंवा जुनी नगरपालिका याठिकाणी नवीन पोलीस ठाणे करण्यात यावे, यामुळे शहरातील सर्वस्तरांतील नागरिकांना न्याय मिळण्याचे काम, अडीअडचणी सुटण्याचे काम विनाहस्तक्षेप होऊन कायदा व सुव्यवस्था अबाधित राहून येवलेकरांचा न्याय व्यवस्थेवरील विश्वास अखंडित राहील, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
यावेळी अद्वैत देशपांडे, हर्षा ठाकूर, संग्राम भंडारे, श्रावण महाराज जगताप, संदीपगिरी महाराज यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आनंद शिंदे, राजश्री देशपांडे, सोनाली परदेशी यांच्यासह शोकडो युवक-युवती उपस्थित होते. प्रसाद भावसार, रोहित सांबरे यांनी सूत्रसंचालन केले.