नवी दिल्ली : आरबीआयच्या नियमांचे उल्लंघन केल्याने दोन खाजगी क्षेत्रातील बँकांना दंड ठोठावला आहे. यावेळी आयसीआयसीआय बँकेवर १२.१९ कोटी रुपये, तर कोटक महिंद्रा बँकेवर ३.९५ कोटीचा दंड ठोठावण्यात आला आहे. याआधी सेंट्रल बँकेने सार्वजनिक क्षेत्रातील एसबीआय, इंडियन बँकेला कोट्यवधी रुपयांचा दंड ठोठावला होता.
दंड आकारणीची माहिती देताना आरबीआयने सांगितले की, आयसीआयसीआय बँकेला कर्ज व अॅडव्हान्सशी संबंधित निर्बंधांचे पालन न केल्याने आणि अहवालाशी संबंधित नियमांचे उल्लंघन केल्यामुळे दंड ठोठावण्यात आला आहे. तर दुसरीकडे वित्तीय सेवांच्या आउटसोर्सिंगमध्ये आचारसंहितेशी संबंधित सूचनांचे पालन न केल्याने कोटक महिंद्रा बँकेस दंड ठोठावला आहे.
गेल्या एक महिन्यात मध्यवर्ती बँकेने २० सहकारी, खासगी, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना दंड ठोठावला आहे. सर्वाधिक दंड आयसीआयसीआय बँकेला ठोठावला आहे. सेंट्रल बँक नियमांचे उल्लंघन केल्यावर दंड आकारते. मात्र त्याचा बँक खातेदारांवर परिणाम होत नाही. ग्राहक त्यांच्या खात्यातून पैसे काढू – जमा करू शकतात.
ही देशातील बँकिंग नियामक संस्था आहे, जी व्याजदरापासून बँकांपर्यंतचे बँकिंग नियम बनवते, ज्याचे बँकांना पालन करावे लागते. जर कोणत्याही बँकेने या नियमांकडे दुर्लक्ष केले किंवा त्याचे उल्लंघन केले तर आरबीआय त्या बँकेवर कारवाई करते. अनेक प्रसंगी रिझर्व्ह बँकेने ग्राहकांच्या हिताचे रक्षण करताना बँकांवर दंडात्मक कारवाई केली आहे.