नाशिक : विल्होळी येथील चव्हाण व भावनाथ कुटुंबिय आणि शेतकरी बिबट्याच्या दहशतीने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी रहिवाश्यांकडून केली जात होती. त्यानंतर वन अधिकाऱ्यांनी त्याठिकाणी पिंजरा लावला असता त्या पिंजऱ्यामध्ये बिबट्या जेरबंद झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विल्होळी येथे गुळवे पॉलिटेक्निक कॉलेज मागे चव्हाण यांच्या मळ्यात बुधवारी (दि. ११) बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी बिबट्या खाण्याच्या शोधात आला आणि पिंजऱ्यात अडकला. वनविभागाने लावलेल्या पिंजर्यात बिबट्या पकडला गेल्याने भावनाथ व चव्हाण कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले आहे.
याआधीही अमोल भावनाथ यांचा मळा आहे. यांच्या शेतात दि. २६ सप्टेंबर रोजी सकाळी बिबट्या दिसून आला होता. तर या अगोदर एक महिन्यापूर्वी बिबट्याचे दर्शन झाले होते. याशिवाय आठ दिवसांपूर्वी भावनाथ यांच्या घराजवळ बिबट्या दिसला होता. यांनतर सलग दोन दिवस घरातील महिलांना बिबट्या फिरताना दिसला.अधूनमधून सकाळच्या सुमारास पुन्हा घराजवळून बिबट्या जाताना दिसत होता. यावेळी बिबट्याच्या पायांचे ठसे देखील या भागात उमटलेले शेतकऱ्यांनी पाहिले होते. कदाचित गवतात त्याची बछडे असल्याने तो तिथे फिरतो, असा शेतकऱ्यांचा अंदाज होता.
तसेच जनावरांना चाऱ्यासाठी रोज गवत कापून आणावे लागत असल्याने बिबट्यामुळे महिलांना गवत कापायला जाण्यासाठी भीती वाटत होती. जवळपास रोजच बिबट्या आढळून येत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या परिसरात भावनाथ यांचे तीन कुटुंब, चव्हाण यांचे चार कुटुंब तसेच कंपनी कामगारांचे काही कुटुंबे राहतात. एक महिन्यांपासून बिबट्या वारंवार दिसत असल्याने नागरिक घाबरून गेले होते.
त्यानंतर याबाबत अमोल भावनाथ यांनी विल्होळीचे उपसरपंच भास्कर थोरात यांच्याशी संपर्क केला होता. तर वन विभागाला याबाबत पत्र देऊन पिंजरा लावण्याची मागणी करण्यात आली होती. बिबट्याचा वाढता वावर लक्षात घेऊन याठिकाणी पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद केले.