अश्विनी भालेराव, नाशिक : आयुष्यात कधी कुणावरती काय वेळ येईल आणि कधी कोणते संकट येईल ते काही सांगता येत नाही, त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये आपण नेहमी सकारात्मक राहिले पाहिजे. आपले प्रत्येकाचे आयुष्य हे रंगमंचासारखे आहे. त्यामुळे प्रत्येकाची भूमिका देखील वेगळी आहे. आयुष्याचा प्रत्येक टप्प्यावरती अनुभवाच्या सोबतीने आपले आयुष्य आपल्याला सुंदर पद्धतीने सजवता आले पाहिजे, असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते, कवी अमोल चिने यांनी नवीन नाशिक वसंत व्याख्यानमालेचे कै. दौलतराव वाघ स्मृती व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प ‘आयुष्य हा रंगमंच’ या विषयावर गुंफत असताना केले.
![कितीही संकटे आले तरी आयुष्य हसत हसत जगता आले पाहिजे -- अमोल चिने 1 IMG 20230531 195627 scaled](https://i0.wp.com/nashikfast.com/wp-content/uploads/2023/05/IMG_20230531_195627-scaled.jpg?resize=640%2C853&ssl=1)
सध्या प्रत्येक जण धावपळीमध्ये आपला आयुष्य जगत आहे. अशा काळामध्ये या अस्वस्थतेच्या युगामध्ये सकारात्मक विचारांची शिदोरी आपल्याजवळ असली पाहिजे, त्यासाठी वेळ मिळेल असे आपण वाचन केले पाहिजे. वाचनामुळे माणूस प्रगल्भ होतो, त्यामुळे आपण आपल्या दैनंदिन जीवनातील बहुतेक वेळ हा वाचनासाठी दिला पाहिजे, असेही चिने यांनी सांगितले. सध्याचा काळ हा धावपळीचा आहे त्यामुळे प्रत्येकाचे जीवन हे रस्त्यावरच्या वाहनासारखे धावते आहे. या अस्वस्थतेच्या काळामध्ये सकारात्मक राहणे फार गरजेचे असून त्यासाठी माणसाला पुस्तकांशिवाय दुसरा चांगला मित्र असू शकत नाही असेही चिने यांनी सांगितले. तसेच त्यांनी अनेक उदाहरणांच्या माध्यमातून उपस्थित रसिकांना कधी धीर गंभीर तर कधी अनेक विनोदी उदाहरणांच्या माध्यमातून हसण्यास भाग पाडले. यावेळी व्यासपीठावर डॉ. राजेंद्र वाघ, डॉ. संगीता वाघ, प्रा. श्रीकांत सोनवणे, मोतीराम पिंगळे आणि प्रा. एस. के. कुशारे, रवी पवार उपस्थित रसिकांशी त्यांनी तासभरापेक्षा जास्त वेळ व्याख्यानाच्या माध्यमातून संवाद साधला. कार्यक्रमाचे प्रास्तविक सावळीराम तिदमे यांनी केले. वक्ते आणि पाहुण्यांचा परिचय देवराम सैंदाणे आणि अश्विनी भालेराव हिने केले. आभार प्रदर्शन कैलास चुंबळे यांनी केले तर सुत्रसंचालन व्याख्यानमालेचे किरण सोनार यांनी केले. यावेळी कवयित्री सुवर्णा बच्छाव आणो कविता बिरारी यांनी कविता सादर केल्या.
उद्याचे व्याख्यान – स्वानंद बेदरकर विषय – संत साहित्याची गरज