*आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज*
स्मृतीशताब्दी विशेष -**✍️
शब्दांकन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे *
शिक्षणाशिवाय कोणत्याही देशाची उन्नती नाही, असे इतिहास सांगतो. अज्ञानात खितपत पडलेल्या देशात उत्तम मत्सुद्दी व लढवय्ये वीर कधीही निपजणार नाहीत. म्हणूनच सक्तीच्या व मोफत शिक्षणाची भारताला अत्यंत गरज आहे. हीच गरज ओळखून मोफत आणि सक्तीचे शिक्षणाची सुरुवात करणारे, जातीय विषमतेच्या भिंती गाडून त्यावर पुरोगामी विचारांची इमारत भक्कमपणे उभी करणारे, लोकराजे, छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची आज जयंती. शक्ती, बुद्धी आणि न्याय यांचा अभूतपूर्व संगम असलेला, असा रयतेचा राजा पुन्हा होणे नाही! दीनदलितांच्या या कल्पवृक्षाला सादर प्रणाम. २६ जून हा शाहू महाराजांचा जन्मदिवस महाराष्ट्र शासनातर्फे ‘सामाजिक न्याय दिन’ म्हणून साजरा केला जातो. यादिवशी सार्वजनिक कार्यक्रम होतात. कोल्हापूरच्या राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फे ‘राजर्षी पुरस्कार’ रोख एक लाख रुपये आणि सन्मानचिन्ह या, स्वरुपात दिला जातो. तर ६ मे हा दिन स्मृतीदिन म्हणून साजरा केला जातो. यंदाचे हे स्मृतीशताब्दी वर्ष असून राज्यात वर्षभर विविध उपक्रम, कार्यक्रम राबविण्यात आले आहे.
छत्रपती शाहू महाराजांचा जन्म २६ जून १८७४ रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांचे मूळ नाव यशवंत, त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव (आप्पासाहेब) तर आईचे नाव राधाबाई होते. कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी १७ मार्च १८८४ रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले, व ‘शाहू’ हे नाव ठेवले. सन१८८९ ते १८९३ या चार वर्षांच्या कालखंडात धारवाड येथे शाहू महाराजांचा शैक्षणिक आणि शारीरिक विकास झाला. शिक्षण चालू असतानाच १ एप्रिल १८९१ रोजी बडोद्याच्या गुणाजीराव खानविलकर यांच्या लक्ष्मीबाई या मुलीशी शाहू विवाहबद्ध झाले. या वेळी त्यांचे वय १७ वर्षांचे होते आणि लक्ष्मीबाई वय १२ वर्षांहून कमी होते. २ एप्रिल १८९४ रोजी त्यांचा राज्यारोहण समारंभ झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर इ.स. १९२२ सालापर्यंत म्हणजे २८ वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते. मुंबई येथे ६ मे १९२२ रोजी त्यांचे निधन झाले. हिंदुस्थानात उदार राजे अनेक झालेत, पण त्यांच्या औदार्यालाही अहंपणाची सूक्ष्म किनार होती. पण शाहू महाराजांनी अहंपणा औषधालाही शिल्लक ठेवला नव्हता. कारण आपण शिवरायांच्या नुसत्या गादीचे नव्हे, तर वैचारिक जाणिवेचे वारसदार आहोत, याचे क्षणभरही विस्मरण महाराजांनी होऊ दिले नव्हते.
“तहानलेला विहीरीकडे जातो, विहीर तहानेल्याकडे जात नाही”. पण शाहू महाराजांनी या म्हणीला सन्माननीय अपवाद प्रस्तुत केला होता. बाबासाहेब आंबेडकर हे अमेरिकेहून उच्च शिक्षण घेऊन आले ही गोष्ट कानी पडताच, एका महाराच्या मुलाची ही कर्तबगारी ऐकून, राजांचा अभिमानाने उर काय भरुन आला आणि ते मुंबईच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या बाबासाहेबांना शोधत, त्यांच्या घरी काय जाऊन पोहोचलेत. शाहू महाराजांनी बाबासाहेबांना पहाताक्षणी कडकडून काय मिठी मारली. आजची परिस्थिती पहाता हा प्रसंग स्वप्नवत वाटतो. खरंच शाहू महाराजांच्या या दिलदारपणाला तोड नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना माणगावच्या परिषदेमध्ये “दलितांचा नेता” व “भारतीय अग्रणी नेता” म्हणून घोषित केले. यापुढील काळामध्ये बाबासाहेबांनी दलित उपेक्षित समाजाचे नेतृत्व करावे असे आवाहन महाराजांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘मूकनायक’ हे साप्ताहिक ३१ जानेवारी १९२० ला प्रथम प्रकाशित केले. परंतु आर्थिक अडचणीमुळे पुढे ते बंद पडले. परंतु हे राजर्षी शाहू महाराजांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तत्काळ आर्थिक मदत केली. शाहू यांनी सर्व उपेक्षित समाजातील व अस्पृश्य वर्गातील लोकांना आपल्या संस्थानामध्ये आरक्षणाद्वारे नोकऱ्या देण्याचा प्रयत्न केला यादृष्टीने संपूर्ण भारतामध्ये आरक्षणाचे जनक म्हणून त्यांचा गौरव केला जातो. सामाजिक न्यायाची भूमिका घेऊन शाहूराजांनी सामाजिक समतेसाठी प्रयत्न केले.
शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षणप्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी इ.स. १९१९ साली सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली. जातिभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. इ.स. १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. बहुजन समाजाला राजकीय निर्णयप्रक्रियेत सामावून घेण्यासाठी त्यांनी इ.स. १९१६ साली निपाणी येथे ‘डेक्कन रयत असोसिएशन’ ही संस्था स्थापली. वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेले वेदोक्त प्रकरण शाहू महाराजांच्याच काळात झाले. त्यांचे शिक्षण ब्रिटिश अधिकारी फ्रेजर यांच्या हाताखाली झाले. पुढील शिक्षण राजकोटच्या राजकुमार कॉलेज मध्ये व धारवाड येथे झाले. अभ्यास व् शैक्षणिक सहलीद्वारे मिळालेले व्यवहारज्ञान यामुळे शाहूराजे यांचे व्यक्तिमत्व विकसित झाले होते. १८९६ चा दुष्काळ व नंतर आलेली प्लेगची साथ या काळात त्यांची कसोटी लागली आणि त्याला ते पूर्णपणे उतरले. दुष्काळी कामे, तगाईवाटप, स्वस्त धान्यदुकाने, निराधार आश्रमाची स्थापना हे कार्य पाहता ‘असा राजा होणे नाही’ असेच प्रजेला वाटते.
मानवी जीवनाच्या विकासाचे असे एकही क्षेत्र नाही, ज्यासाठी महाराजांनी काम केले नाही. सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला. राधानगरी धरण बांधून सिंचनाची सोय केली. कुस्तीला प्रोत्साहन दिले. बहुजन व मागासवर्गीय समाजातील मुला-मुलींना परिपूर्ण शिक्षण मिळाल्याशिवाय त्यांचा बौद्धिक, सामाजिक व आर्थिक विकास शक्य नाही हे महाराजांनी हेरले व ५०० ते १००० लोकवस्तीच्या गावाला शाळांची निर्मिती केली व शिक्षण सक्तीचे केले, एवढे करून न थांबता त्यावरील शुल्क माफ केले. जे पालक आपल्या पाल्यांना रोज शाळेत पाठविणार नाही अशा पालकांना प्रतिमहिना एक रुपया दंड आकारण्याची कायदेशीर तरतुदही केली. तसेच त्यांनी वसतीगृहे उभे केलीत, गरिब विद्यार्थ्यांसाठी तर त्यांनी आपला राजवाडाच खुला केला. यामुळे बहुजन व मागासवर्गीय समाजातील विद्यार्थी-विद्यार्थीनींना शिक्षणाचे दरवाजे खुले झालेत. ८ सप्टेंबर १९१७ रोजी सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाचा जाहिरनामा काढला. राज्याभिषेक झाल्यानंतर शाहू महाराज तब्बल २८ वर्षे कोल्हापूर संस्थानचे छत्रपती होते. ६ मे १९२२ रोजी मुंबई येथे त्यांचे निधन झाले. त्यांच्या पवित्र स्मृतीस शतशः प्रणाम….. 🙏🏻🙏🏻