नाशिक : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून जल जीवन मिशन कार्यक्रमांअंतर्गत येवला तालुक्यातील राजापूरसह ४१ गाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आणि धुळगाव व १७ गावे प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना या दोन्हीही योजनांचे कार्यारंभ आदेश निर्गमित झाले असून लवकरच या योजनेच्या कामाला सुरुवात होणार आहे.
राजापूरसह ४१ गाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजचे काम १६३ कोटी रुपये तर धुळगाव व १७ गावे नळ पाणी पुरवठा योजनेचे काम ६३ कोटी ४४ लक्ष रुपयांचे असुन या कामांसाठी यापूर्वीच निधी मंजूर करण्यात आलेला आहे.
सतत दुष्काळाच्या छायेत असलेल्या येवला तालुक्याला टंकरमुक्त करण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे सातत्याने प्रयत्न सुरु आहे. यासाठी येवला तालुक्यात विविध पाणी पुरवठा योजना राबविण्यात येत असून येवला तालुका हा दुष्काळमुक्तीच्या दिशेने यशस्वीपणे वाटचाल करत आहे. येवला तालुक्यातील अडतीसगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेवर इतर गावे जोडल्यामुळे या योजनेवर अतिरिक्त भार निर्माण झालेला आहे. या योजनेतील काही गावांचा समावेश धुळगांव व १७ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेत करण्याच्या सूचना छगन भुजबळ यांनी दिलेल्या होत्या.त्यानुसार शासनाने ६३ कोटी ४४ लक्ष च्या या योजनेला प्रशासकिय मंजूरी दिली होती.
या योजनेचा कार्यारंभ आदेश निर्गमित झाल्याने आता लवरच जागा ताब्यात घेऊन या योजनेच्या कामाला सुरुवात होणार आहे. येवला तालुक्यातील धुळगाव व १७ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेत समाविष्ट असलेल्या धुळगाव, पिंपळगाव लेप, एरंडगाव खु., एरंडगाव बु., जळगाव नेऊर, नेऊरगांव, देशमाने बु., मानोरी बु., शिरसगाव लौकी, सतारे, भिंगारे, पुरणगाव, मुखेड, जऊळके, चिचोंडी बु., चिचोंडी खु.,सताळी, बदापूर या गांवाचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे.
राजापूरसह ४१ गाव पाणी पुरवठा योजनेचा कार्यारंभ आदेश निर्गमित
सदर प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या जागेचा प्रश्न सोडवण्यासाठी भुजबळांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र जागेचा प्रश्न देखील लवकरच मार्गी लागून या योजनेचे कामही लवकरच सुरू होईल. या योजनेसाठी पन्हाळसाठे येथून ग्रॅव्हीटीद्वारे सर्व गावांना पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे येवला तालुक्यातील राजापूर, ममदापूर, रेंडाळे, अंगुलगाव, डोंगरगाव, देवदरी, खरवंडी, रहाडी, पिंपळखुटे तिसरे, पन्हाळसाठे, वाघाळे, आहेरवाडी, कोळम खुर्द, पांजरवाडी, जायदरे, हडपसावरगाव, वाईबोथी, खामगाव, देवठाण, गारखेडा, भुलेगाव, मातुलठाण, कौटखेडे, आडसुरेगाव, धामणगाव, लहीत, गोरखनगर, वसंतनगर, चांदगाव, भायखेडा, कोळम बु, कोळगाव, कूसमाडी, नायगव्हाण, खिर्डीसाठे, महालगाव सह घना माळी मळा,गणेशपूर, कासारखेडे, दुगलगाव व बोकटे या ४१ अवर्षणप्रवण क्षेत्रातील गावांचा प्रश्न कायमचा मार्गी लागणार आहे.