शैक्षणिक सहलीतून दिला स्वच्छतेचा संदेश
जळगाव निंबायती (वार्ताहर) येथील अहिल्यादेवी शिक्षण संस्थेच्या गोविंदराव यशवंतराव पाटील कनिष्ठ महाविद्यालयाची तीन दिवसीय शैक्षणिक सहल नुकतीच संपन्न झाली. या अंतर्गत ओझर, लेण्याद्री, शिवनेरी, आळंदी, देहू, वाई, पाचगणी, महाबळेश्वर, पोलादपूर, महाड, मुरुड जंजिरा, काशिद, अलिबाग आदी स्थळांना भेटी देण्यात आल्या. यावेळी विद्यार्थ्यांनी शिवनेरी किल्ल्यावर स्वच्छता अभियान राबवून, स्वच्छतेबाबत जनजागृती केली.
शिवनेरी गडाच्या पायथ्याशी, शिवाई देवीचा मंदिर परिसर, गडावरील पायवाटा व बालेकिल्ला येथे शैक्षणिक सहलीतील विद्यार्थ्यांकडून स्वच्छता करण्यात आली. या मोहिमेत दोन पोती प्लॅस्टिक, पाण्याच्या बाटल्या व थर्माकोल सदृश अविघटनशील कचरा गोळा करून तो गडाच्या पायथ्याशी आणून त्याची विल्हेवाट लावली. यावेळी गडावर जाणाऱ्या रस्त्यावरील पाण्याच्या रिकाम्या बाटल्या थर्मोकोलचा कचरा गोळा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध घोषणा देऊन स्वच्छतेबाबत जनजागृती केली. संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती कासूताई पाटील, सचिव महेंद्र पाटील, समन्वयक निंबाजी शिंदे यांच्या प्रेरणेने व प्राचार्य पी. एन. पवार, पर्यवेक्षक व्ही. डी. काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर उपक्रम राबविण्यात आला. यावेळी सहल विभाग प्रमुख तथा उपक्रम प्रमुख प्रा. अमोल अहिरे यांच्या नेतृत्वाखाली जेष्ठ प्रा. पी. जी. माने, एस. टी. जाधव, पी. यु. शिंदे, सी. डी. राजपूत, डी. एस. जमधाडे, श्रीमती पी. आर. आहेर, श्रीमती एस. सी. खोले, भगवान, ३५ विद्यार्थीनी व ४५ विद्यार्थ्यांच्या समूहाने स्वच्छता अभियान राबवून जनजागृती केली.
शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना परिसर ज्ञान प्राप्त व्हावे, निसर्ग, पर्यावरण, ऐतिहासिक स्थळे, सांस्कृतिक, भौगोलिक माहिती व्हावी, विद्यार्थ्यांना गडकिल्ले पाहता यावेत, इतिहास, भूगोल कळावा, विद्यार्थ्यांना काहीसा विरंगुळा मिळावा, त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून शाळा महाविद्यालयांकडून शैक्षणिक दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असलेल्या ठिकाणी सहल काढली जाते. पाटील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहलीतून गडकिल्ल्यांवर राबविलेल्या स्वच्छता अभियानतून सामाजिक संदेश दिला आहे. या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
– ऐतिहासिक वारशाचे जतन व्हावे
गडावरील पायवाटा, झाडे-झुडपे, पाण्याचे टाके येथे पर्यटकांकडून फेकलेल्या रिकाम्या बाटल्या आढळतात. झाडांवर, येथील भिंतींवर विविध प्रेमसंदेश तर दिसतातच त्या व्यतिरिक्त च्युईंगम चिकटवलेली झाडाची खोडेसुद्धा आढळून येतात. पायवाटांवर, झाडाझुडपात फोडून टाकलेल्या बाटल्यांमुळे स्थानिकांना, गुरांना व पर्यटकांना नाहक त्रास होतो. अर्धवट खाऊन टाकलेल्या पदार्थांमुळे परिसरात दुर्गंधी पसरते. यातून गडाचे पावित्र्य धोक्यात येते. शिवाय गडाचे विद्रूपीकरण होते. विकृत मानसिकतेने पर्यटक कचरा, खाद्यपदार्थ, काचा तिथेच टाकून परतीच्या वाटेला लागतात. ही मानसिकता बदलली तरच गड-किल्ले स्वच्छ राहू शकतील व या ऐतिहासिक वारशाचे जतन होईल. मात्र त्यासाठी प्रत्येकानेच पुढाकार घेणे गरजेचे आहे. शिवाय जनजागृतीची आवश्यकता आहे.
प्रा. अमोल अहिरे, सहल विभाग प्रमुख