पंचवटीत लाटे नगर भागात एक महीला भटक्या कुत्र्यांना जेवायला देत असल्याने हे कुत्रे परिसरातील नागरिकांना चावा घेतात असा आरोप बाळासाहेबांची शिवसेनेचे पदाधिकारी दिगंबर मोगरेने करत महिला आणि तिच्या मुलीला मारहाण केली होती . या घटनेबाबत अखेर उशिरा का होईना पंचवटी पोलीस ठाण्यात संशयित आरोपींविरोधात मारहाण करणे आणि विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
गुरुवार दि १ रोजी दुपारी साडेतीन चार वाजेच्या सुमारास हिरावाडी येथील लाटे नगर परिसरातील ऋग्वेद सदनिका येथील रहिवासी दामिनी नरेंद्र लेरु आणि त्यांची मुलगी श्रुती खिरा यांना त्यांच्या घराखाली बोलावून पोलिसात तक्रार दिली याचा राग मनात धरून बाळासाहेबांची शिवसेनेचे पदाधिकारी दिगंबर मोगरे यांनी पुरुष आणि महिला साथीदारांसह येऊन पोलिसात तक्रार देण्याची खूप हाऊस आहे ना अशी कुरापत काढून थेट दामिनी लेरू यांचे केस पकडून जमिनीवर पाडत पोटावर,छातीवर लाथा बुक्क्यांनी जबर मारहाण केली . तसेच,मारहाण करताना सर्व पुरुषांनी नको त्याठिकाणी हात लावून मोबाईल फोन तोडले असून,या परिसरात लावलेले सर्व सीसीटीव्ही कॅमेरे काढून घेऊन गेले असल्याची तसेच,मुलगी श्रुती हिस दोरीने उलटे लटकावून देऊ,तिच्यावर बलात्कार करू,तिला जिवे ठार मारून टाकू आणि कुत्र्यांना विष देऊन मारून टाकू अशी धमकी दिल्याची तक्रार पीडित दामिनी लेरू यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात दिली .
पीडित दामिनी लेरू यांच्या तक्रारीवरून संशयित दिगंबर मोगरे त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका पूनम मोगरे,दिगंबर मोगरे यांची आई,डॉ सोनवणे त्यांच्या पत्नी पद्मा सोनवणे,वैशाली बागुल,वानखेडे मावशी,कपिल वानखेडे,ज्योती पाटील,संगीता रांगे,जमदाडे नावाची महिला,स्नेहा जोंधळे आणि त्यांच्यासोबत असलेले अनोळखी इसमाविरुद्ध मारहाण करणे,महिलांचा विनयभंग करणे आदींसह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे
पीडित महिला दामिनी लेरू यांना मारहाण झाल्यानंतर कसाबसा आपला जिव वाचवत त्यांनी पंचवटी पोलीस ठाणे गाठत आपली कैफियत मांडली . मात्र,पोलिसांकडून त्यांना कुठलेच सहकार्य मिळत नसल्याने त्यांनी आपल्या हितचिंतकांना याबाबत माहिती देत अवगत केले असता याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोनाफोनी झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले . त्यामुळे प्रकरण परस्पर मिटविण्याच्या तयारीत असलेल्या स्थानिक पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना नाईलाजास्तव मध्यरात्री गुन्हा दाखल करावा लागल्याची चर्चा आहे .
परिसरातील सीसीटीव्ही आणि पीडित महिलांचे मोबाईल गायब केला असल्याचा आणि गळ्यातील सोन्याची चैन चोरी गेल्याचा आरोप पिडीतेकडून करण्यात येत आहे . मात्र,असे असताना देखील पोलिसांकडून दरोडा,जबरी लूट करणे हा गुन्हा दाखल का करण्यात आला नाही . संशयितांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाल्यानंतर त्यांना अटक का करण्यात आली नाही असे एकनाअनेक प्रश्न पीडितेच्या नातलगांकडून उपस्थित केले जात आहे .