नाशिक – भारतीय संविधानातील मौलिक तत्त्वे, मुलभूत हक्क आणि कर्तव्ये स्वतंत्र भारताच्या नागरिकांना संस्कारीत करणारी आहेत. संविधानाने अनिष्ट रूढी प्रथा परंपरांसह अस्पृश्यतेचे समूळ उच्चाटन करून सामाजिक न्यायावर आधारित स्वातंत्र्य समता बंधुता या मूल्यांचे अधिष्ठान असलेली भारतीय जीवनपद्धती प्रस्थापित केली आहे. खर्या अर्थाने भारतीय जनतेच्या आशा आकांक्षांना मूर्त स्वरूप देण्याचे कार्य संविधानाने केले आहे. असे प्रतिपादन राज्यशास्त्र विषयाचे अभ्यासक प्रा. अमोल अहिरे यांनी केले, ते के. के. वाघ महाविद्यालयाच्या वतीने आयोजित ‘संविधानातून लोकशाही मूल्यांची रुजवणूक’ या विषयावरील व्याख्यानात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. ए. डी. नांदूरकर होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. व्ही. एम. सेवलीकर होते.
यावेळी बोलताना अहिरे म्हणालेत, संविधानातील काही कलमे कालानुरूप बदलण्याचा व नवे कायदे करण्याचा अधिकार संसदेला असला, तरी संविधानाचे मूळ स्वरूप कोणीही बदलू शकत नाही. संविधान देशाचा सर्वोच्च कायदा असून, नागरिकांचे मूलभूत हक्क आणि लोकशाही टिकवून ठेवण्याचे कार्य न्यायपालिका करते. भारतातील लोकशाही आणि संविधानिक मूल्ये अबाधित राखण्यासाठी महाविद्यालयीन युवक-युवतींनी मोलाची भूमिका बजावली पाहिजे, याकामी संविधानाचा सखोल अभ्यास करुन विद्यार्थ्यांनी देशातील घराघरांत व प्रत्येक नागरिकांच्या मनामनात संविधानिक मूल्यांचा प्रचार व प्रसार करावा. असे आवाहन प्रा. अहिरे यांनी उपस्थितांना केले.
‘भारतीय संविधानाची ओळख’ हा विषय विद्यापीठांतील सर्व विद्याशाखांसाठी अनिवार्य झाला असल्याने, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व कर्मवीर काकासाहेब वाघ कला, वाणिज्य, विज्ञान व संगणक महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सदर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक प्रा. मयूर उशीर यांनी केले, तर आभार प्रा. ए. एच. बेंडाळे यांनी मानलेत, सदर कार्यक्रमास महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला