नाशिक : प्रतिनिधी
सैयद पिंपरी येथे पाटाच्या पाण्यात एका इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्याचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. बुधवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. मृत्यू झालेला विद्यार्थी देशाचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा नातलग असल्याचे समजते….
अभिषेक कैलास खरात असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो के के वाघ इंजिनियरिंग कॉलेज मध्ये कॉम्पुटर सायन्सच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत होता. दोन दिवसांपूर्वीच त्याचा चुलत भाऊ सुरज खरात याने अभिषेक बेपत्ता असल्याची तक्रार आडगाव पोलीस ठाण्यात दिली होती. पोलीस या विद्यार्थ्याचा शोध घेत असतानाच आज तालुक्यातील सैय्यद पिंप्री येथील पाटाच्या पाण्यात मृतदेह आढळून आला. यानंतर ग्रामीण पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली. या विद्यार्थ्याने आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.