भारतीय स्वातंत्र्याला ७४ वर्ष पूर्ण होऊन आपला देश या यावर्षी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करतोय. यानिमित्ताने अखिल भारतीय विद्यार्थी परिषद महाराष्ट्र प्रदेशातर्फे हर घर तिरंगा – घर घर तिरंगा अभियान येत्या १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिना निमित्ताने राबविणार आहे. या अभियानासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात सामूहिक ध्वजारोहण, तिरंगा फेरी, भारत माता प्रतिमा पूजन, घरावर तिरंगा ध्वज लावणे अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र प्रदेशातील १४८ तालुक्यातील १६६६ ठिकाणी सार्वजनिक ध्वजारोहण, १६४ तिरंगा फेरी, २३०३ गावातील ६०१६६ कुटुंबात भारत माता प्रतिमा पूजन व ‘घर घर तिरंगा – मन मन तिरंगा’ हे ब्रीद घेऊन २३११७ घरावर राष्ट्र ध्वज लावण्यात येणार आहेत. या अभियानामध्ये अभाविपचे एकूण ३६८३ कार्यकर्ते सक्रिय असणार आहेत. तालुका, शहर, गावा पाडे अशा सर्व स्तरावर अभियान प्रमुख म्हणून कार्यकर्त्यांना जबादारी देण्यात आलेली आहे. अभाविप विविध वाड्या वस्त्या, गाव पाडे, शहर, नगर इत्यादी स्थानांवर राष्ट्रीय कलामंचच्या माध्यमातून एक शाम – देश के नाम, वकृत्व स्पर्धा, भव्य रांगोळी स्पर्धा, विविध विषयांवर परिसंवाद अशा विविध गतीविधींचे आयोजन करण्यात येणार आहे.
सदर अभियान हे नाशिक जिल्ह्यात सुद्धा देखील होणार आहे. नाशिक जिल्ह्यातील १५,००० घरांमध्ये भारत मातेचे प्रतिमा पूजन करणार असून यात नाशिक जिल्ह्यातील २०६ कार्यकर्ते सहभागी असणार आहेत. या अभियानात एक कार्यकर्ता आपल्या परिसरातील १०० घरी संपर्क साधून भारत मातेची प्रतिमा व अभाविप चे माहिती पत्रक वाटणार आहे व या अभियानाची माहिती सांगत त्यांना सामील करून घेणार आहे. सोबतच अभाविप नाशिक चे कार्यकर्ते बस स्थानक, ट्रॅफिक सिग्नल, महाविद्यालये, कार्यालये इ. ला देखील वाटप करणार आहेत.
तरी सदर अभियानात नाशिक जिल्ह्यातील नागरिकांना आपल्या घरी भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करायचे असल्यास भारत मातेच्या प्रतिमा मिळवण्यासाठी अभाविप नाशिक ( ८५३०९७१९४९ ) ला संपर्क साधावा.
या अभियानाच्या माध्यमातून गाव, वस्ती, पाडा व कॉलनीतील पोहोचून भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने विविध उपक्रमांमध्ये नागरिकांना अभाविप सहभागी करून घेणार आहे. आगामी वर्षभर अभाविप संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन करणार आहे, अशी माहिती अभाविप महाराष्ट्र प्रदेश सहमंत्री विराज भामरे यांनी दिली.
भारत देश स्वातंत्र्याची ७४ वर्षे पूर्ण करून ७५व्या वर्षात पदार्पण करणार आहे. म्हणजेच हे वर्ष भारतीय स्वातंत्र्यासाठी अमृत महोत्सवी असणार आहे. या अमृत महोत्सवी वर्षात अभाविप नाशिक संपूर्ण वर्षभर विविध प्रकारचे अभियान, कार्यक्रम राबवणार आहे तसेच पुढच्या १५ ऑगस्ट पर्यंत अभाविप नाशिक ७५,००० घरांमध्ये भारत मातेच्या प्रतिमा वाटप करणार आहे असे प्रतिपादन अभाविप नाशिक महानगर मंत्री सिद्धेश खैरनार यांनी केले.
सदर पत्रकार परिषदेसाठी अभाविप महाराष्ट्र प्रदेश सहमंत्री विराज भामरे, अभाविप नाशिक महानगर मंत्री सिद्धेश खैरनार उपस्थित होते. हर घर भारत माता, घर घर भारत माता अभियानाचे प्रमुख श्रेयस पारनेरकर यांनी सूत्रसंचालन केले.