उपेक्षित घटकांच्या विकासाद्वारेच आत्मनिर्भरतेकडे वाटचाल
रमेश पांडव
नाशिकः उपेक्षित,वंचित दुर्बल समाजाची कार्यक्षमता ओळखून त्याला थोडी ताकद दिली, फुलण्याची,विकासाची संधी दिली तरच, भारत आत्मनिर्भर होईल ,असे प्रतिपादन सामाजिक समरसता मंचाचे संयोजक प्रा.रमेश पांडव यांनी केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नाशिक शहरातर्फे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि महात्मा ज्योतीबा फुलेंच्या जयंतीचे औचित्य साधून पांडव यांचे `डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि आत्मनिर्भर भारत` या विषयावर ऑनलाईन व्याख्यान झाले.
पांडव यांनी डॉ.बाबासाहेबांच्या जीवनातील विविध समर्पक उदाहरणे देत आजच्या काळात या विषयांची किती महत्व आहे, हे विषद केले.
ते म्हणाले, विविध क्षेत्र आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे गेली अनेक वर्षे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली जाते. याचं एक विशेष आहे ते म्हणजे,डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या दृष्टीने आणि दिशेने मार्गदर्शन केले आहे. हे मार्गदर्शन संघाला देश आणि समाजाच्या दृष्टीने महत्वपूर्ण वाटते. सुदैवाने डॉ.आंबेडकरांनी १९३९ च्या पुण्यातल्या संघशिक्षा वर्गास संघाचे संस्थापक डॉ.हेडगेवार यांच्या उपस्थितीत एक भाषण दिलेले आहे. बाबासाहेबांना राष्ट्रीय स्वयंसेवक आदर देतो,मार्गदर्शक मानतो तसाच डॉ.बाबासाहेबांनाही संघ माहिती होता,डॉ.हेडगेवारांशी त्यांचा संपर्क जवळीक होती, याचा संदर्भ आपल्याला मा.खासदार बाळासाहेब साळुंखे यांच्या आत्मचरित्रात वाचायला मिळेल. साळुंखे आणि मंडळी बाबासाहेबांना घेऊन भावे स्कूलमधील ऑफीसर ट्रेनिंग कॅम्पला तेथे गेले होते. तेथे डॉ.हेडगेवारांनी बाबासाहेबांचे भाषण ठेवले होते.
बाबासाहेबांची व संघाची समांतर चळवळ
डॉ.बाबासाहेबांची वेगवेगळी टिकाटिप्पणीची पुस्तके उपलब्ध आहे. ती आपल्याला कुठेही पहायला, वाचायला मिळतील, असे नमूद करून पांडव म्हणाले,बाबासाहेबांची आणि संघाची चळवळ ही समांतर आहे. बाबासाहेबांनी संघावर टिका केली,कटूतेने बोलले, पुस्तक लिहीलयं असं आपल्याला सापडत नाही. १४ ऑक्टोबर १९५६ ला नागपूरातील धम्म दिक्षा सोहळ्यावेळी त्यांचे एक भाषण आहे, त्यात ते म्हणतात, कुणाला वाटेल कि मी दिक्षेसाठी नागपूर का निवडले, इथे संघाची पलटन आहे म्हणून नव्हे तर ही नागभूमी त्यांनी स्वतःहुन स्पष्ट केले. संघाचे ज्येष्ठ प्रचारक दत्तोपंत ठेंगडी हे बाबासाहेबांच्या संपर्कात होते. काहीकाळ बाबासाहेबांच्या चळवळीतही त्यांनी काम केले, कुणी हे मान्य करो ना करो,पण स्वतः ठेंगडी यांनी सांगितल्याचे मी ऐकले असल्याचे पांडव म्हणाले.
आयुष्याच्या सुरवातीलाच व्यापक विचार
श्री.पांडव म्हणाले, बाबासाहेबांचे चिंतन हे हा देश,हे राष्ट्र यासंदर्भात केलेले आपल्याला पहायला मिळते. पण त्यांच्या जेव्हा लक्षात आले की समाजव्यवस्थेत सर्व गोंधळच आहे, कशी,व्यवस्था कशी,असे असतांना हे राष्ट्र म्हणून कसे पुढे येणार,याचा बाबासाहेबांचा अभ्यास आहे. मॅट्रीक्युलेट होणारा हा वंचित घटकातील पहिलाच मनुष्य होता, त्यानंतर बडोद्याचे सयाजीराव गायकवाड यांनी स्कॉलरशिप मुंबईत दिली आणि त्यानंतर पदवीपर्यतचे शिक्षण झाले. पुढे ते लंडन,अमेरिकेला गेले. ते स्वतः राष्ट्रचिंतक,राष्ट्रपुरुष होते. त्याचे चिंतन हे राष्ट्राच्या चौकटीतच बसलेले आहे, आपण ते बळजबरीने बसविण्याची गरज नाही, असे मला वाटते. त्यांच्या भारतीय जातीव्यवस्था या पहिल्या निबंधातच त्यांनी जातींविषयक आणि अंतर्गतपध्दती व्यवहार यावर सविस्तर विवेचन केले आहे.
जाती या देशविरोधी
श्री.पांडव म्हणाले, मनुपूर्वीही जाती होत्या असे बाबासाहेबांनी नमूद केले आहे, पुढे त्यांनी टोला लगावला आहे कि, ब्राम्हणांनी जाती निर्माण केल्या नाहीत,कारण ते त्यांच्या क्षमतेबाहेरचे होते. २९ नोव्हेंबर १९४९ ला संविधान सभेतील शेवटचे भाषण करतांना त्यांनी म्हटले आहे की, जाती या देशविरोधी आहेत, त्या संपल्या पाहिजे, त्याशिवाय पुढे पाऊल टाकणार कसे,असे ठणकावून सांगितले. जातीवर सर्व पक्ष,राजकारण चालले तर देश कसा मोठा होणार,असा प्रश्न त्यांनी संविधान सभेत उपस्थित केला. आजच्या भाषेत सांगायचे झाले तर काही ठराविक मंडळीच्या जीवावर देश कसा मोठा होणार, केवळ एक जात,गट मोठा झाला म्हणजे देश मोठा झाला असे म्हणता येणार नाही. त्याला सर्वांचाच हातभार लागणे अपेक्षित आहे तरच आत्मनिर्भर होण्याची संकल्पना प्रत्यक्षात येऊ शकते.
एकात्म राष्ट्र, समाज जातीनिर्मुलनाशिवाय अशक्य
आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन दिले. ही संख्या वाढू लागल्याने जाती विसरायला मदत होत आहे, जातीची टोकाची भूमिका कमी होऊ लागली आहे. काही राजकीय मंडळी जातीच्या संघटना बांधतात आणि सोयीस्कर आपली पोळी भाजू घेतात आणि सात हजार जातीचे हिंदू म्हणून संघटन करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जातीवादी म्हणतात, असे नमूद करून पांडव म्हणाले, एकात्म राष्ट्र,समाज निर्माण करायचा असेल तर जातीनिर्मुलन होणे आवश्यक आहे, त्याशिवाय ते शक्य नाही, बाबासाहेबांनी याच जातीनिर्मुलन व्यवस्थेला प्राधान्य दिलेले दिसते. उपेक्षित,वंचित असणाऱ्या जातीचे उन्नयन करणे हे सुध्दा महत्वाचे आहे. त्याशिवाय देश,राष्ट्र आत्मनिर्भर झाले असे म्हणताच येणार नाही.
दहा टक्क्यांचा कायदा नव्वद टक्क्यांवर लादणार का
संविधान सभेतील एका भाषणात ते दहा टक्क्यांचा कायदा नव्वद टक्क्यांवर लादणार का? असा प्रश्न उपस्थित करतात आणि सांगतात उपेक्षित,वंचितांचा विकास हेच ध्येय हवे, आजही संविधान सोडले तर या घटकांला संरक्षण दुसरे कुठले आहे. हा समाज,गरीब,दरिद्री आहे,काय करावे, हे त्यांच्या लक्षात येत नाही. माऊली,बाप या आधाराने हा समाज बाबासाहेबांकडे पाहतो आणि ती आपलीच लेकरे आहे असे बाबासाहेब मानतात, यावर वेगवेगळी गाणी रचलेली आपल्याला ऐकायला मिळतात. असे पांडव यांनी नमूद केले.
उपेक्षित,वंचित घटक आघाडीवर
श्री.पांडव म्हणाले, आज समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रात उपेक्षित,वंचित घटक आघाडीवर असलेला दिसते. आपल्या देशातील या घटकांमध्ये काहीतरी करून दाखविण्याची जिद्द आणि उपजत कला आहे म्हणून देशातील विविध प्रांतात ते आघाडी घेत आहे, उत्तमपणे व्यवसाय करत असल्याचे दिसते म्हणूनच आपला भारत `देश हा सोने की चिड्डीया` म्हणून ओळखला जातो. यासाठी बाबासाहेबांनी या उपेक्षित,वंचित घटक मोठा होत नाही, त्यांच्या उत्पन्नाची,व्यवसाय,विकासाची,पोटापाण्याची सोय होत नाही. तोपर्यत त्यांच्याकडून “आऊटकम” कसे येईल, याचाही विचार व्हायला हवा. बाबासाहेबांचे विचार हे उध्दवस्त करणाऱ्यांपैकी नाही, हे आपण लक्षात घ्यावे. एकत्र येऊन खरेदी, गटशेती,शेतीतील प्रयोग, प्रयोगशील शेतकरी यांची त्यांनी उदाहरणे देत, धनदांडगे वंचित घटकांच्या नावाखाली कशापध्दतीने ओरबडण्याचा प्रयत्न करत आहे,संविधानाचे पालन आम्ही केले तर आत्मनिर्भरतेकडे वाटचाल आपण करू शकतो, असे त्यांनी शेवटी नमूद केले.